♥ काव्यशिल्प साहित्य संमेलन... सहर्ष स्वागत **** ♥


भारतीय राजकारण देशास अधोगतीकडे नेईल

स्वातंत्र्य प्राप्तीच्या अवघ्या सत्तर वर्षात देशातून राष्ट्रभक्ती नामशेष व्हावी हा भारतीय वीनाशाचा प्रथम संकेत आहे. आज आमच्या देशातील प्रत्येक बालक, युवा आणि वयोवृद्ध, एकच स्वप्नं बघत असतो की कमीत कमी वेळात, कमीत कमी कष्ट करुन जास्तीत जास्त कसे गर्भ श्रीमंत होता येईल ? आमच्या देशात भ्रष्टाचार हा राष्ट्रीय रोग झाला आहे. लाच राष्ट्रीय भोजन झाले आहे. तसेच आमच्या देशाला काल्पनिक धर्माच्या आणि जातीच्या नावावर गलीच्छ राजकारण करण्याचा फार मोठा गंभीर आजार झाला आहे. निवडणुका येताच देशात काल्पनिक धर्म आणि जातपात यांचा भल्या मोठ्या प्रमाणावर खोटा आणि भडकावू प्रचार सुरू होतो. आजही आमच्या देशात सर्वच प्रकारच्या निवडणुका हया जातीच्या, धर्माच्या आधारावरच लढल्या जातात आणि जिंकल्या पण जातात. आमचा देश 1200 वर्षे गुलाम जात आणि धर्म या कारणामुळेच राहिला आणि आजही आहे. आमच्या देशात युवा पिढीची मानसिकता जर सुधारली नाही तर पुढेही आम्ही राजकारणी समुदायाचे गुलामच राहू यात शंका नाही. फरक येवढाच आहे, आधी परकीयांनी गुलाम बनविले आता आमचे राज्यकर्तेच आम्हांस गुलाम बनवून पाशवी अत्याचार करीत आहेत. कधी राम रहीम च्या नावावर, तर कधी हिंदू- मुस्लिम, तर कधी सीख-ईसाई च्या नावावर राजकारण करुन लोकांना परत परत त्याच काळ्याकुट्ट आणि वीनाशाच्या खाईकडे मार्गक्रमन करण्यास प्रवृत्त करीत आहे. अगदी मूठभर लोकांचा यात व्यक्तीगत लाभ होतो पण देशाचे फार मोठे नुकसान होत आहे.

नवीन पिढीला या राजकारणी लोकांचा हा अमानुष डाव समजून घेऊन त्यांना मोठी अद्दल घडविण्याची वेळ येऊन ठेपली आहे. आज देशाला स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतरही खरच आरक्षणाची गरज आहे काय ? आणि जर आहे असे वाटत असेल तर ते आरक्षण केवळ आर्थिक आधारावरच हवं. ज्या देशाचा आजही मुळ राजकारणी मुद्दा आरक्षण, धर्म संप्रदाय, आणि जातपात आहे. तो देश कधी प्रगती करेल, किंवा महाशक्ती बनेल अशी खोटी आणि भ्रामक आशा भारतीयांनी मुळीच बाळगू नये. जो देश स्वातंत्र्या नंतर केवळ 70 वर्षात आपल्या क्रांतिकारांच्या बलिदानाला विसरला, त्यांच्या अमृतमयी राष्ट्रभक्तीच्या विचारधारेला विसरला, थोर संतांची आणि राष्ट्रभक्तांची शिकवण आणि आदर्श विसरला. तो देश महाशक्ती बनेल अशी अंधभक्ती जोपासने हाच खरा अधर्म होय. अश्या काल्पनिक विचारधारेचा अंगीकार ज्या देशाची युवा पिढी करीत असेल तो देश केवळ आणि केवळ रसातळालाच जाईल ही जाणीव जर आजच्या तरुण पिढी आणि राजकारणी लोकांना झाली नाही, तर हे अघोरी राजकारण राक्षसी आणि भ्रष्टाचारी भारतीय मानसिकता देशाचे पतन केल्याशिवाय राहणार नाही.

आजची युवा पिढी आणि राजकारणी जर देशाला विकासाच्या मार्गावर नेवू शकत नसेल तर ही 125 कोटी भारतीयांसाठी फार लाजिरवाणी गोष्ट आहे. आम्ही देशहितासाठी जर काही करू शकत नसेल तर आम्हांला देशाला लूटून खाण्याचा, अराजकता पसरवीण्याचा, जाती धर्माच्या नावावर दंगे करुन सामाजिक बंधूभावात फूट पाडण्याचा, आणि आमच्या शूर पराक्रमी, देशासाठी बलिदान केलेल्या महान देशभक्तांचा अपमान करण्याचा सुद्धा काही अधिकार नाही. जो पर्यंत आमचा देश मंदिर-मज्जिद, राम- रहीम, जात-पात, आरक्षण, याच प्राथमिक मुद्दांवर अडकून पडला राहील, तोपर्यंत या देशाचा विकास शक्यच नाही. एकाच देशात हिंदू आणि मुस्लिम लोकांकरिता वेगवेगळे कायदे. हिंदूसाठी परिवार नियोजन, मुस्लिमांना सवलत, अपराधी मजेत जनता सजेत, काय चाललंय काय या देशात ? स्वातंत्र्या नंतर या देशात एकही नेता असा नाही जन्मला ज्याला जनता आजीवन लक्षात ठेवेल. ज्याचे नाव काढताच डोळ्यात अश्रू येतील. किंवा त्यांचे काही नारे जगप्रसिद्ध झाले असतील. जसा शास्त्रीजींचा नारा " जय जवान जय किसान" "मेरी झाशी नही दूँगी" "तुम मुझे खून दो मै तुम्हे आझादी दूँगा" "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, आणि तो मी मिळविणारच" इत्यादि.

महान कायदे पंडित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, मला असा धर्म किंवा देव नको जो जिवंत असतांना उपाशी ठेवतो, आणि मृत्यु नंतर स्वर्गाचे स्वप्नं दाखवितो. तसेच मला अश्या देव किंवा धर्माचीही गरज नाही जो एका भारतीयास दुसऱ्या भारतीया सोबत लढवितो. बाबासाहेब म्हणतात मला अश्या काल्पनिक धर्माचीही गरज नाही ज्या धर्मात मनुष्याच्या स्पर्शाने मनुष्य बाटतो, अस्पृश्य होतो आणि गोमुत्राने शुद्ध होतो. बाबासाहेब म्हणतात देऊळ उभारून केवळ भिकाऱ्यांची संख्या वाढते तर वाचनालय, ग्रंथालयाची निर्मिती केल्यास अधिकारी लोकांची संख्या वाढते. ज्याने देशाचा विकास होतो. बाबासाहेबांना कायदेपंडित आणि विश्व प्रसिध्द देवाने किंवा धर्माने नाही शिक्षणाने केले. समाजव्यवस्था आणि काल्पनिक धर्माने तर त्यांचे आणि दलितांचे केवळ शोषणच केले. जो धर्म स्त्री आणि पुरुष यामधे भेद करतो, जो धर्म स्त्रीयांवर अत्याचार करायला शिकावीतो, स्त्रियांना भोगवस्तू समजतो, त्यांना शिक्षणाचा आणि स्वछंद उडण्याचा, विहार करण्याचा अधिकार देत नाही, त्यांना सामाजात मान सन्मान देत नाही, असा देव आणि धर्म असूच शकत नाही. ही केवळ स्वार्थी उच्चभ्रू मानव निर्मित व्यवस्था आहे. धर्माची आणि अध्यात्माची अशी अधर्मी, क्रृर वागणूक आणि संस्कृती असूच शकत नाही. एकीकडे आम्ही म्हणतो आम्ही सारे एकाच देवाची लेकरे आहोत. मग हा भेदभाव का होतो ? आणि हा भेदभाव हा मुका, आंधळा, आणि पांगळा देव मुकाट्याने का बघत असतो ? कारण अत्याचार देव, धर्म करीत नाही मानव करतो. आणि स्वतःहा सुरक्षित राहण्यासाठी मध्ये मग पाप, पुण्य आणि देव, धर्माची भाषा वापरतो. युवा पिढीला या राजकारणी छळातून, मानसिकतेतून बाहेर येण्याची नितांत आवश्यकता आहे.

जे देश किंवा राष्ट्र अश्या काल्पनिक मुद्यांवर राजकारण करीत नाही. त्यांचा विकास फार वेगाने झाला. भारत आजही पाषाणी चमत्कार आणि बुवाबाजी या मानसिकतेवरच आपले यश आणि विकास शोधत आहे. भारतीय जिथे जिथे जातात तिथे तिथे आधी देऊळ बांधतात, आणि विदेशी जिथे जिथे जातात तिथे तिथे आधी उद्योग, शाळा, विद्यालय, दवाखाने, रस्ते नागरिक सुरक्षा, बौद्धिक, मानसिक विकास, रोजगार, नागरी हक्क यांवर लक्ष केंद्रित करतात. भारतीय समाज दिवसेंदिवस फार जास्त दुहेरी मानसिकतेत जगायला लागला आहे. घरोघरी देवपुजा आहे, तरी घरोघरी भ्रष्ट आचरण आहे, अत्याचार, शोषण आणि कुंठित मानसिकता आहे. देवाला मानणारेच देवाच्या नावावर दंगे करतात. देवीला मानणारे कन्या भ्रूण हत्या करतात. स्वतःहा धर्म पाळत नाही. मनसोक्त अधर्म आणि भ्रष्टाचार करतात. देवांनी, संतांनी दाखवीलेल्या मार्गावर चालत नाही. जिथे स्वार्थ साधून घ्यायचा असेल तिथे देवालाच ठेंगा दाखवितात. मग त्याच देवाला खुश करण्याकरीता नवस बोलून लाच देतात. म्हणजे ज्या देशात देवच लाच घेऊन खुश होतो. ज्या लोकांकडून विशेष रुचकर भोग, प्रसाद अर्पण केल्या जातो फक्त त्यांनाच देव पावतो आणि उर्वरित लोकांचे शोषण करतो त्या देशाचा विकास शक्य आहे काय ? जो दुसऱ्यावर वीसंभून राहतो मग देवांवर असो की दानवावर त्यांचा कार्यभार नेहमी बुडत असतो, असे तुकाराम महाराज म्हणतात. आम्ही भारतीय पवित्र धर्म आणि देव यांची बदनामी किंवा खोटा प्रचार करायला भीत नाही तर मग इथे माणसाची काय पर्वा आहे.

एकंदरीत देव आणि धर्माची खोटी, अशुद्ध आणि भ्रामक कल्पना, प्रसार आपल्या देशात राजकारणी, तथाकथित संधी साधू, संत आणि बुद्धिजीवी हेतू पुरस्परपणे करून देशाच्या जनतेला भ्रमित करीत आहे. माणुसकी, निष्पक्षता, बंधुभाव, राष्ट्रप्रेम, दया, करूणा आणि शांती हाच खरा धर्म होय. धर्म हिंसा, चोरी, लबाडी, भ्रष्ट आचरण शिकवत नाही. आमच्या देशात राजकारणी लोकांएेवढे भ्रष्ट आणि अधर्मी कुणीच नाही. आणि विशेष म्हणजे हेच लोक धर्माच्या पोकळ गोष्टी करतात. यापेक्षा मोठा विनोद दुसरा काय असू शकतो. जोपर्यंत आमच्या देशातून ही अधर्मी, सांप्रदायिक, वर्णवादी, जातीयवादी, पूंजीवादी राजकारणी मानसिकता संपत नाही. भारतीय समाजाचा दृष्टीकोण शास्त्रीय होत नाही. जोपर्यंत आम्ही "युद्ध नको बुद्ध हवा" ही मानसिकता स्वीकारत नाही. जोपर्यंत देशातील निवडणुका धर्माच्या आणि जातीच्या नावावर लढल्या आणि जिंकल्या जाईल. धर्म आणि संप्रदाय यातला फरक समाज आणि युवा पिढी स्पष्ट पद्धतीने समजून घेत नाही. केवळ विकास आणि विकास या एकाच गोष्टीवर भारतीय समाज जोवर लक्ष केंद्रित करीत नाही. राजकारणी लोकांना जनता जोपर्यंत स्वतःहून त्यांच्या विकास प्रदर्शनाच्या आधारावर जाब विचारीत नाही. जोपर्यंत राजकारणात अपराधी लोकांचा प्रवेश पूर्णतःहा थांबत नाही. जनता त्यांच्यावर जोपर्यंत तुटून पडत नाही, राजकारणात जोवर संप्रदाय, धर्म आणि जात यांचा वापर होत राहील, तोवर भारतीय समाज प्रगती करुच शकत नाही. युवा पिढीच्या हातात आता देशाचे भविष्य आहे. देशाचा "विनाश की विकास" हा निर्णय सर्वांना मिळून करायचा आहे. अंधाराकडून प्रकाशाकडे जायचं की या जातीयवादाच्या आणि काल्पनिक धर्माच्या भ्रमित अंधाऱ्या कोठडीतच, चक्रव्यूहातच स्वतःला आणि देशाला संपवून टाकायच, हा निर्णय युवा पिढीला करायचा आहे, देशाच्या जनतेला करायचा आहे. केवळ राजकारणी लोकांवर वीसंभून राहीलो तर भारतीय स्वातंत्र्य आणि भारतीय भविष्य दोन्हीचा पण विनाश झाल्यावाचून राहणार नाही. भारतीय राजकारण देशाला अधोगतीकडे नेतच आहे. आपण या अधोगतिचे साक्षीदार व्हायच की क्रंतिविर, विकासविर व्हायच हा निर्णय जनतेला आणि युवा पिढीला करायचा आहे.

जिस देश का हमने नमक खाया,
उसका गाना होगा गुणगान...
छोटी सोच और ओछी राजनीतीसे,
बंदो देश हो जायेगा शमशान...

जय हिंद...
सुनील पाटोळे,
169, मानेवाड़ा बेसा रोड,
अलंकार नगर,
नागपुर - 440044
दूरध्वनी क्र.
097760 38850
070777 56627
Email mail :-
patolesunil009@gmail.com